युनिकोड ते साऊंडकोड – लेख 31 – मृत्युशय्येवरच्या
मायमराठीची हाकाटी
'संस्कृत ही देवभाषा आहे', असे ज्यांना वाटते त्यांनी देव बनून ती भाषा
वापरावी! मानव असूनही त्यांना जर तसेच वाटत असेल तर त्यांनी मराठीचा त्याग करून
संस्कृत मधुन बोलायला व लिहायला सुरवात करावी. भारतभरच्या कोणत्याही राज्यात, रस्त्यावर वा ऑफिसात संस्कृत बोलली व वापरली जात नाही. म्हणजेच 'संस्कृतला
देव भाषा' मानणार्या व्यक्तींना संस्कृतच्या प्रसारासाठी बरेच काम करता
येण्यासारखे आहे! मराठी भाषेतून आयुष्य जगताना 'पैसा, नोकरी, घरदार, मुलेबाळे,
आपुलकी, नातीगोती, कुटूंब, . . ' अशा जीवनावश्यक गरजांसाठी संस्कृत-भाषा किती कामी
आली? देवापुढे हात जोडून मागणे वा गार्हाणे जर मराठीतून मागितलेत तर देवाला ते
कळणार नाही, असे वाटते का? जर तुमच्या देवालाही मराठी कळते तर मराठी ही सुद्धा
देव-भाषाच ठरते ना?
भाषा म्हणून संस्कृतपेक्षा मराठी कितीतरी पटीने क्षेष्ठ आहे. पण लहानपणापासून
'संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे' असे पढवले गेले. जगातील सर्वात जुनी आणि अनेक
पिढ्यांनी स्वतःहून केलेली ही जाहीरात ठरते! गिनिज-वर्ड-रेकॉर्ड मध्ये याची जरूर
नोंद झाली पाहीजे!
वेद हे संस्कृतमधून लिहीले गेले. त्या साडेतीन हजार वर्षापूर्वी भारताने
असंख्य शोध लावले. संस्कृतची पाठराखण करण्याच्याच एकमेव उद्देशाने हजारो वर्षे
प्रसारीत केलेली आणखी एक संस्कृत-प्रचूर जाहीरात ऐका, 'सर्व ज्ञान वेदात आहे'. संस्कृत-भाषा
आहे कशी?, याचे सामान्य ज्ञानही नसताना, अशा जाहीरातींमुळे, 'संस्कृतला
नावे ठेवलीत तर पाप लागेल, देव तुम्हाला नरकात पाठवेल' असाच प्रकारची मानसिकता
समाजात निर्माण झाली.
संस्कृतबाबतच्या अशा दहशती व भितीपोटी काय घडले? मराठी विचारवंत, मान्यवर,
प्रतिष्ठीतांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वजण, पुजापाठ करताना भटजींनी
म्हटलेल्या संस्कृत मंत्रातील 'शुन्यसुद्धा कळत नसताना' गुपचूप हात जोडून, डोळे
मिटून, अंधश्रद्धेने वागत होते आणि अजूनही वागत आहेत. आधुनिक काळातील सर्व इंग्रजीपणातील
सुधारणा महाराष्ट्रातील घराघरातील व्यक्तींच्या आचरणात आणल्या जातात पण जेव्हा
पाप, श्रद्धा, पूण्य सामोरे येते तेव्हा मात्र संस्कृतची आठवण येते. चर्चने जगभर
त्या त्या भाषेतून आपल्या प्रार्थना सांगितल्या व प्रसार केला. आता केवळ 'भटजींना
संस्कृत मंत्राचा अर्थ सांगा', एवढेच सांगितले जाते. जर हे मंत्रांचे सूत्र
मराठीतूनच म्हटले वा सांगितले गेले तर ती पूजा ठरणार नाही, त्यातून पवित्रता
निर्माण होणार नाही, त्यातून शांतता, स्थैर्य, सुखशांती लाभणार नाही, त्यातून देव
पावणार नाही, असेच समाजाला अजूनही वाटते! समाजाच्या मनामनात दडलेला हा
मराठी-भाषेबाबतचा एकप्रकारे अविश्वास, परकेपणा व तिरस्कार ठरतो.
भाषा म्हणजे संवादाचे साधन. यापेक्षा भाषेलाच जर मोठेपण दिले तर मानवाची
बुद्धी व विचार-शक्तीच गहाण टाकल्यासारखे होते. भारतात संस्कृत-भाषेबाबतच्या वरील
अनेक दहशतवादी घोषणांमुळे समाजाने आपली बुद्धी आणि विचारक्षमताच गेली कित्येक हजार
वर्षे गहाण टाकल्याचे दिसते. संस्कृतसोडून इतर कोणतीही भारतीय भाषा वापरून अध्ययन
करणे भारताने सोडून दिले होते.
'अध्ययन' या शब्दाचा अर्थ, '''''वेद-उपनिषदे-पुराण शिकणे, पुजाअर्चा यातून
वापरले जाणारे मंत्र-ऋचा-श्लोक तोंडपाठ करणे, छत्तीस हजार देवांच्या वैयक्तीक
गोष्टींबाबत जास्तीतजास्त माहिती मिळवणे (त्यांची वाहने कोणती?, पत्नी-मुले-नातलग
कोणते?, त्यांना आवडणारे पदार्थ कोणते?, त्यांच्या पुजेसाठीचा योग्य काळ कोणता?, .
. . वगैरे वगैरे असंख्य अगणीत!), रामायण-महाभारत तसेच भगवत-गीता यांचे दररोज पठण
करणे, सकाळी अंगणात रांगोळी काढण्यापासून ते सायंकाळच्या भजनांपर्यंतच्या अनेक
गोष्टींची पारायणे करणे, रामरक्षा-मारूतीस्त्रोत्र-शनीमहात्म्य अशा काव्यांचे
आवर्तन करणे, काय काय आणि किती किती'''', एवढ्यापुरताच मर्यादीत राहीला.
त्यातून भारतात काय घडले? गेल्या हजारो वर्षांतील मानवी शोध भारतात लागले
नाहीत. ते लागले युरोपात व अमेरीकेत! भारतात केवळ संस्कृत भाषेतून ज्ञान प्राप्त
होते, असे वाटल्याने हे घडले असावे का? नाहीतर भारतीय बुद्धी गेली हजारो वर्षे 'कोणती
केळी खात होती?'! इंग्रजी भाषा भारतात आली आणि भारतातील प्रादेशिक भाषेतून संशोधन
केल्यास संस्कृत-भाषेचा राक्षस खायला येईल, त्यापेक्षा युरोपीयन भाषा वापरून आपण
आपली बुद्धी वापरू, त्यातून भारतीय देवांचे अरिष्ट टळेल, असेच जणू बुद्धीवादी
व्यक्तींना कळत नकळत वाटले असावे!
आजही मराठीतून कोणत्याही संशोधनाच्या वाटचाली होत नाहीत कारण आत्ताच्या
मराठी-भाषेतही पुन्हा संस्कृतची ढवळढवळ आहेच. मराठीने मराठीचा मराठीसाठी
मराठीपणातून मराठीपुरताच विचार करून मराठी-भाषेचेच व्याकरण लिहीण्याची मुभा मराठीला
मिळालीच नाही. संस्कृतचे व्याकरण मराठीत जास्तीतजास्त घुसडण्यासाठी मराठीची
मराठीतच 'तत्सम' व 'तत्भव' अशी फाळणी केली गेली! मराठीच्या अंतरंगाची अशी चिरफाड
सर्व मराठीप्रेमी खुशाल बघत राहीले! कुठे गेला ज्ञानेश्वरांनी संस्कृतपासून
मराठीला अलिप्त करण्यासाठी केलेला प्रयत्न? कुठे गेली राज्यकारभारात मनसोक्तपणे मराठी
वापरलेली शिवाजी महाराज आणि पेशवे यांची मोडी-लिपी? जर खरोखरच ज्ञानेश्वरांचा,
शिवाजीचा, पेशव्यांचा आदर असेल तर त्यांच्या वेळच्या मराठीला जसेच्यातसे
जगवण्यासाठी तुम्ही काय केलेत? काहीही नाही.
आता मराठीने देवनागरीतून प्रवास केला तरी गद्यातून मोडी प्रमाणे एक-वेलांटी
एक-उकार गद्यातून वापरले गेले की झाले. मराठीला या साध्यासोप्या सहजसुलभ उपायातून
काय घडेल? आत्ताचे चुकीचे पुस्तकी व्याकरण आणि शुद्धलेखन नियमावली नेस्तनाबूत
होतील. मराठी पुन्हा स्वतंत्र, स्वावलंबी, स्वयंपूर्ण होईल. होय, हे खरोखरच सहज
शक्य आहे. यातून काय घडेल? मोडी-लिपीच्या वेळच्या मराठीला जसे शुद्धलेखनाच्या
नियमांची आवश्यकता भासली नाही तशी यापुढेही ती मराठीला भासणार नाही. कारण
शुद्धलेखन नियमावली खास करून बनलीच केवळ दोन-वेलांट्या आणि दोन-उकार यात लेखनातून
प्रमाणता आणण्यासाठी! मराठीच्या उपजत मूलभूतपणाला लागलेला हा रोगच नष्ट झाला की
त्यावरची ही फसवी उपाययोजना आपोआपच नष्ट होते. समाजाचा याबाबतचा खात्रीशीर होकार
आला की त्यातून लोकाश्रय मिळेल आणि राजाश्रय सहजतेने प्राप्त होईल. सरकारलाही
संस्कृतप्रचूर व्यक्ती काय म्हणतील? समाजाला हे पटेल का? निवडणूकीतील आपली मते या
कारणाने कमी तर होणार नाहीत ना? त्यापेक्षा प्रस्थापीत व्यवस्थेलाच थोडी मदत होईल
असे घडवता आले तर? याच विचारातून मराठीचा संगणकासाठीचा 'स्पेल चेकर' आणला गेला.
मुक्तपणे हसत खेळत वावरणार्या मराठीच्या लिहीत्या हातांना पडल्या आहेत, शुद्धलेखन
जाणकारांच्या बेड्या. अहो, मुलांना निबंध, लेखकांना कथा-कादंबर्या, पत्रकारांना
लेख, संशोधकांना प्रबंध तर सोडाच पण तुमच्या मुलांच्या लग्नाची पत्रिकाही तुमची
तुम्हाला मराठीतून शुद्धपणे लिहीता येत नाही! अहो बघता काय, बादलीभर पाण्यात
मराठीचे विसर्जन तरी करा! संस्कृत-भाषा येत नाही आणि मराठी वापरता येत नाही. मग 'संस्कृतचे
शिव्याशाप न लागता', 'मराठीतील न पाळता येणारे व्याकरण व शुद्धलेखन-नियमावलीचा
अडथळा न येता' आमचे जीवन जगायचे तरी कसे? याच विचारातून घराघरातून आता इंग्रजीचा
पुरस्कार होत आहे.
'मराठी वाचवा', 'मराठी असे आमुची मायबोली', 'मराठी शाळा बंद करू नका', अशा
घोषणा म्हणजे भरल्यापोटी घेतलेले उखाणे ठरतात. या घोषणा ''भाषणातल्या टाळ्या,
निवडणूकीतील मते, विद्वत्तेचा दिखावा, साहित्यसम्मेलनातील गदारोळ, चर्चासत्रातील
चहा-बिस्किटांपुर्वीचा सुखकर काळ'', एवढ्यापुरत्याच मर्यादीत राहतात.
संस्कृतच्या पदरात गहाण टाकलेल्या मराठीला चुकीच्या पुस्तकी-व्याकरणाच्या आणि
शुद्धलेखन नियमावलीच्या जाचातून सोडविण्याचा मार्ग म्हणून, संगणकाच्या कुबड्या घेत,
'मराठी स्पेलचेकर' आणण्याचा उपद्व्यापही घडवला जात आहे. पुस्तकी-व्याकरण आणि
शुद्धलेखन नियमावली नेस्तनाबूत करून, मूलभूत उपजत मराठीचे स्वैर उधळू शकणारे पाय, तिचे
तिला परत देता येत असताना, त्यावर संस्कृत-प्रचूर भाटांना काय वाटेल? या धास्तीने
मराठीला जमेल तेवढे आणखी काही दिवस 'कोमा'त जगत ठेवत, ऋग्णालयात दाखल करून, संगणकातून
'मराठी स्पेलचेकर'चे सलाईन देणे आता सुरू होत आहे. अशाप्रकारे मराठीला संगणकीय इलेक्टॉनिक
वैद्यकीय सेवा देऊन आपण तिला कायमचे रोगी बनवत आहोत, हे जाणकारांनी लक्षात घ्यावे.
आजची मायमराठी काय म्हणत आहे?
थकलेल्या पायांच्या मी झिजलेल्या वहाणा ।।
औषधाला सुद्धा नाही कुणी सत्यवादी,
आपापल्या स्वार्थासाठी गौतम आणि गांधी,
सत्तेचा लोभ करी मैत्रीचा बहाणा . . . . .
सदाचारी, शीलवान, शब्द ठरतात खोटे,
संपत्तीच्या घरी मारी समानता खेटे,
इथे चाले राजकारण तोडा-मारा-हाणा . . . . .
पुढार्यांची मने जुळती सहभोजनाने,
मरू टेकल्या मराठीचे दुःख कोण जाणे?
भरल्या पोटांच्या ओठी त्यागाचा उखाणा . . . . .
मराठीचा मराठीसाठी मराठीपुरताच मराठीपणातून विचार करणारी कोणी व्यक्ती शिल्लक
आहे का?
असल्यास कृपया संपर्क साधा.
आपला, शुभानन गांगल
मोबाईल – 9833102727 ईमेल – Shubhanan.gangal@gmail.com
No comments:
Post a Comment